Break up party celebration
प्रेमावर आतापर्यंत कोणी कविता लिहिल्या असतील. कुणी कादंबर्या. त्यातून प्रेमाचे गोडवे गायले असतील. अर्थात त्याचा हातात बेलभंडारा घेण्याऐवजी अनेक पिढ्यातील पोरांनी गुलाबपुष्प (आता व्हॉटसअप) घेऊन उदो उदो केला असेल. राम-सीता, कृष्ण-राधा, नल-दमयंती यांच्या प्रेमाच्या ओव्या आम्ही ऐकल्यात. हीर-रांझा, सोनी-महिवाल, रोमिओ-ज्युलिएटपासून आर्ची-परशापर्यंतच्या लव्ह स्टोर्या आम्ही तोंडपाठ केल्यात. त्यांची गाणीपण गायलीत (बाथरूममध्ये).
एवढे करतो म्हणल्यावर अर्थातच आम्ही प्रेमपुजारी. म्हणजे भक्त की हो. हे तुमच्या ध्यानात यायला पाहिजे. त्या कैलास खेरची मिरेवर लिहिलेली (बन के जोगन चली..)गाणी तर सारखी ध्यानीमनी असतात. प्रेमाची अशी महती आम्ही वेळ मिळेल तिथे सांगतो. पण कुणीतरी मध्येच प्रेमद्रोही म्हणतो (खरे तर त्याला देशद्रोहीच ठरविले पाहिजे) देवाचं ते प्रेम आणि आमचं ते लफडं. या सिद्धांताने प्रेमाविषयीची आमची मूल्य ढळत नाहीत. पण मन हेलावून मात्र नक्की जाते. बरं घटकाभर त्याचं खरं मानलं...
तुझं माझं नातं आता संपलंय.., आय एम सॉरी.., लिव्ह मी अलोन.., तू मला विसरणंच योग्य राहील दोघांसाठीही.., अशी न उमगणारी वाक्य धडाधड कानावर पडतात हल्ली, मग याला काय म्हणायचं.. प्रेमाचा ढेकर आला की ओकारी आली...
मग व्हॉटसअपच्या माध्यमातून मोबाईल नावाच्या इटुकल्या यंत्रातून गम-ए-जुदाईच्या मेसेजचा नुस्ता धबधबा वाहतो. त्यामुळे आम्ही सरावलो आहोत म्हणा. आणि हां वरचा माहोल पाहून समजू जातो, यंदा ब्रेकअप आहे... या जोडप्याचा.
गळ्यात गळे घालून तळ्यात पाय सोडून बसणारे, शोन्या, बाबू, पिल्लू, मनू, राजा, बाळा अशा प्रेमाच्या नावाच्या बारशावेळी पिझ्झा अन चॉकलेटरूपी घुगर्या वाटून ठेवलेल्या नावाची एकदम किळस यायला लागते यांना, (जणू काही बर्गरमध्ये एखादी पाल निघाल्यासारखी..) कम्मालंय बुवा.. या लफडेवाल्यांची आय मीन प्रेमवीरांची.
काल-परवापर्यंत नात्यासाठी अधिर झालेली पोरं वर्षा-दोन वर्षांतच कशी बधीर झालीत, हे नागराज मंजुळे अन अजय-अतुलच काय पण कृष्ण-राधेलाही कळणार नाही. हे आम्ही चारचौघात सांगायला जातो तर.. ज्याने कधी तळ्यातील कमळं कमळीला सोबत घेऊन मोजली नाही, व्हॅलेंटाईन डेलाच कायपण फ्रेंडसशीप डेला सुद्धा ज्याचा हात सुना-सुना असतो (नवरा मेलेल्या बाईच्या कपाळासारखा). त्याने आम्हाला प्यार, इश्क, मोहब्बत शिकवू नये, असा टोमणा ऐकावा लागतो. त्यामुळे आम्ही तोंडघशी पडतो. पण शाहरूखने म्हणलेलंच हाय ना, कोई ना कोई चाहिए प्यार करने के लिए.. माझ्यासारख्या पोरींचा वारा न लागलेल्या माणसाला अशी गाणी धीर देतात. खरे तर लहानपणी अहंकाराचा वारा न लागो राजसा.. हा हरिपाठ सारखा म्हणल्यामुळेच आमच्या जवळपास कुणी फिरकत नाही...असं आमचा मित्र बबन्या विश्लेषण करतो.
प्रेमात पडल्यावर अनेक फ्रेंडस कवी झालेत, अन ज्याला हे जमलं नाही त्याच्या मदतीला सोशल मीडिया धावून आला, आपल्या कस्टमररूपी अशिलाची अब्रू वाचवालयला. कृष्णाने जशा द्रौपदीला एकापाठोपाठ एक साड्या दिल्या तशी व्हॉटसअपने अनेक प्रेम कविता पुरविल्या. प्रेमात वाहवलेले कवी देवदास होतात म्हणे पुढे. पण आता काही तशी सिच्युएशन नाही दिसत. क्योंकी अच्छे दिन आए है.. रिश्ता वही सोच नई, शेतकरी आत्महत्या करतात तशी जान देने की जरूरत नही. तू नही तो और सही और नही तो और सही... अशा आयडियालॉजीचा हा जमाना.. आमच्यासारखे लोक म्हणतील फालतू विचारसरणी आहे ही. पण याला म्हणायचं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, रिश्ता वही सोच नई, नये जमाने की नई सोच.
हा माझा झालाय ब्रेकअप. आता मी नात्यातून बाहेर आलोय (जुने कपडे बदलून आल्यासारखे), मेरी भूल थी की मैने तुमसे प्यार किया...एक्सेट्रा एक्सेट्रा.. असा बिनधास्तपणा होता का पूर्वीच्या प्रेमवीरांत? नाही ना मग उगाच कशाला शिकवता आम्हाला... ब्रेकअपमुळे रोना-धोना बकवास आहे.
रिलेशनशीपची व्हॅल्यू नाही असं नाही.. ठेवतो आम्ही व्हॉटसअपला स्टेटस, सॅडटाईपमध्ये डीपी.. येतात मित्राचे चारदोन समजुतीचे फोन. त्यांनाही समधान मिळतं फ्रेंडशीप निभावल्याचं. पहिलाच ब्रेकअप असेल तर, नया है वह.. असे म्हणून काहीजण टॉर्चरही करतात, भडवे.. पण मॉम-डॅड जाम खूश असतात पोरगा सुटला म्हणून. मस्त असतं ब्रेकअप. त्याने साप कात टाकतो तशी पुनर्जन्माची भावना होत असावी..
ब्रेकअप एक-फायदे अनेक...बहुगुणी ब्रेकअप, आयुर्वेदिक ब्रेकअप अशा जाहिरातीही निघतील कदाचित. तो प्रोडक्ट वापरला की ब्रेकअपचा काहीच त्रास होणार नाही, अशा फायद्यावाल्या कॅचलाईन असतील त्यावर.
शेवटी मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, असं समाजोपयोगी वाक्य ही ब्रेकअपवाली मंडळी वापरतात म्हणे. त्यामुळे त्यांच्या पदरी मनाचे श्लोक म्हणल्याचे पुण्यही आपोअप पडतं. जब दिल ही टूट गया तो जिके क्या करे.. असा बुझदिल विचार थोडाच करायचा असतो.. बी पॉझिटिव्ह..
हां, आहोत आम्ही दुःखात, ओरडून सांगून टाकायचं जगाला सोशल मीडियाच्या कट्ट्यावरून (वॉलवर). करायचं दुःख साजरं म्हणजे सेलिब्रेशन म्हणा हवं तर. नाही तरी आपली इंडियन कल्चर करतेच की मरण दिन साजरा. पुण्यतिथी करणं तरी काय असतं वेगळं, दुःखाचं सेलिब्रेशनच ना. मग पार्टी देऊन ब्रेकअप सेलिब्रेट केले तर बिघडलं कुठं. आमच्यासारख्या रंडक्यांच्या (बिनमैत्रिणीच्या) पोटात दुखायचं काय कारण. दुःख साजरं करते ही जनरेशन म्हणजे आपुल्या मरणाचा सोहळा साजरा करते, तुकोबारायांसारखा. केवढा उदात्त विचार. हजार कीर्तन अन सत्संगाचे कार्यक्रम ऐकल्यानंतरही एवढं तत्त्वज्ञान पदरात पडलं नसतं तेवढं एका ब्रेकअपमुळे येतं. (थॅक्स सोनू, मनू..) याबद्दल तिला शतकोटी धन्यवादच द्यायला हवेत.
दहावा-तेरावा, पुण्यतिथीचं आडवा हात मारून जेऊन येता, तसं मरण दिन प्रेमाचा (ब्रेकअप) सेलिब्रेट केला तर बिघडलं कुठं. शेवटी दुःखात पार्टीसिपेट झालेल्यांचा कडूघास काढावाच लागतो ना. म्हणून द्यावी लागते ब्रेकअपची पार्टी. उद्या कोणी म्हणाले, आताच ब्रेकअप पार्टीत गुलाबजाम खाऊन आलो पोटभर...तर तुमच्या पोटात दुखायचं काय कारण. शेवटी हा उदात्त विचार आहे.
ब्रेकअप झालाय माझा, हे सांगण्यात डबल बेनिफीट असतो. एक तर आपल्यावर कोणीतरी प्रेम केलं होतं हे कळतं, हे सांगताना छाती फुगून येते छपन्न इंचाची (नमोसारखी) ते वेगळंच. आणि असेल तर कुणी पोरगी कतारमध्ये (लायनित) तर ती लगेच अप्रोचही होते. ब्रेकअपमुळे रडतकुडत बसण्यात पॉईंट नाही, असं मानते ही जनरेशन. नाही तरी देवाचे तरी प्रेम कुठे सक्सेस झालेय. कृष्णामुळे राधेचा झालाच ना ब्रेकअप. मिरा राहिलीच ना रडत आयुष्यभर, अनारकली गाडली गेलीच ना भिंतीत सलिमसाठी. आर्ची-परशाचा झालाच ना घात.. इथे आमची राधा सोडून गेलीय तरी आम्ही आहोतच ना जिवंत.. सीर सलामत तो गर्लफ्रेंड पचास.. (शेवटी एकदाच माणूस जन्म मिळतो बरं का, उगाच कशाला सुसाईड-बिसाईड करायचं) केवढा क्रांतिकारी विचार आहे हां. फ्युचरमध्ये पटेल सगळ्यांना...
प्रेम असते लग्नाआधीची चाचणी अन ब्रेकअप असतो घटस्फोटाची रंगीत तालिम... एकाच जोडीदाराला किती काळ कवटाळून बसणार. जुने जाऊ द्या मरणालागुनि.. उगाच नाही म्हणाले मर्ढेकर. जमाना बदललाय, परिवर्तन संसार का नियम है...
रात गयी बात गयी
रिश्ता नया सोच नई
‘प्रेम’से बोलो ब्रेकअपवाले बाबा की जय...
लेखक -
अशोक राजेनिंबाळकर, अहमदनगर
(८१४९६७८०५७)